महाभारतात कौरव-पांडवांच्या महायुद्धात प्रचंड नरसंहार झाला. सत्याचा विजय झाला, तरी हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले. पांडवांना राज्य मिळाले, तरी प्रजेतील पुरुष रणांगणावर धारातीर्थी पडले. यात कोणाचा मुलगा, पती, भाऊ व अन्य सगेसोयरे होते. सर्वच जण शोकसागरात होते. पांडवांच्या घराण्यातही मोठी हानी झाली. हे सर्व विसरून नवीन साम्राज्य उभारणीला युधिष्ठिराने सुरुवात केली. धृतराष्ट्र, गांधारी हे वानप्रस्थाला निघून जातात. त्यांच्याबरोबर संजय आणि कुंतीही जातात. या दरम्यान अनेक सत्य घटनांची उकल होते. सर्व कुळाचा नाश होईल, असा शाप गांधारी श्रीकृष्णाला देते. अरण्याला लागलेल्या आगीत संजय सोडून तिघांचेही देह मृत्यूला सामोरे जातात. वानप्रस्थाश्रम म्हणजे सर्वसंगपरित्याग. असा त्याग करीत पुढे हस्तिनापूरचे सम्राट युधिष्ठिर, त्यांचे बंधू भीम, अर्जुन, नकुल, सहदेव व त्यांची पत्नी द्रौपदीही मृत्यूच्या मार्गाने जातात. पांडवांच्या या प्रस्थानाची कहाणी भास्कर जाधव यांनी ‘महाप्रस्थान’ या पुस्तकातून कथन केली आहे.
पुस्तक : महाप्रस्थान
लेखक : भास्कर जाधव
प्रकाशन : शुभंकर पब्लिकेशन, कोल्हापूर
पृष्ठे : ६४०
मूल्य : ७४५ रुपये
(‘महाप्रस्थान’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून सवलतीत घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)